'बल्हारपूर मतदार संघ सर्वात मागासलेला मतदारसंघ आहे'


'बल्हारपूर मतदार संघ सर्वात मागासलेला मतदारसंघ आहे', असे विधान आज चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. त्यांनी  आज मूल येथे पत्रकार परिषदेत भाष्य केले. बल्हारपूर निर्वाचन क्षेत्र हा चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा भाग आहे.  त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून या मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकर यांची असतांना, त्यांनी आपल्याच 'क्षेत्राला' मागास ठरवून टाकल्यांने, खुद्द कॉंग्रेस कार्यकर्तेही त्यांच्या 'मागास' शब्दावरून अवाक् झालेत.

खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर, त्या पहिल्यादांच मूल येथे आढावा बैठकीसाठी आले असतांना स्थानिक पत्रकारांशी विश्रामगृहात चर्चा केली.  यावेळी, मूल तालुक्यातील अधिकार्यांना कोणतीही माहीती राहत नाही, कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देत नाही असा आरोप माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला, याच आरोपाची रि खासदार धानोरकर यांनी ओढली. सिमेंट रस्ते तयार केले, मात्र ते पक्के रस्ते जलजिवन विभागाने फोडले, हे बुजविण्यासाठी आता अधिकारी म्हणतात, निधी नाही अशी परिस्थिती असल्याचे धोटे यांनी सांगीतले.

जिल्हयात आज कोणतीही योजना चालू नाही, ज्या योजना चालू झाल्या, त्या पुर्णत्वास आल्या नाहीत, शेवटच्या घटकांपर्यंत पाणी पोहचले नाही याकडे श्रीमती धानोरकर यांनी लक्ष वेधले. या योजना पूर्णत्वास पोहविण्यात केंद्र शासन अपयशी ठरले आहे, पण केंद्र सरकार खोट बोल पण रेटून बोल अशा पध्दतीने काम करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. वित्त आयोगाचा पैसा मोठ्या ग्रामपंचातीला बर्यापैकी येतो, मात्र छोट्या ग्राम पंचायतीला अत्यल्प निधी मिळतो, त्यामुळे या ग्राम पंचायतीला पाण्याचे वीज बिल देयक देण्यास अडचण होते असे एका प्रश्नाचे उत्तरात त्यांनी सांगीतले.

पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे स्थानिक नेते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!