थँक्यू ताई, तुम्ही खरेच बोललात… बल्हारपूर क्षेत्र सर्वाधिक मागासलेला आहे!
थँक्यू ताई, तुम्ही खरेच बोललात… बल्हारपूर क्षेत्र सर्वाधिक मागासलेला आहे!
एक अनावृत्त पत्र – खासदार प्रतिभा धानोरकर यांना…
आदरणीय ताई,
मनापासून आभार!
तुमच्या एका विधानाने संपूर्ण बल्हारपूर मतदारसंघात सत्याची ट्यूब पेटली.
"बल्हारपूर विधानसभा क्षेत्र हे सर्वाधिक मागासलेलं आहे" – तुम्ही स्पष्टपणे बोललात, आणि आम्हाला वाटलं, अखेरीस कोणी तरी खरोखर बोललं!
हो, हे म्हणणं सत्य आहे आणि ते ऐकून आम्हाला किंचित समाधानही वाटलं.
पण ताई, हे विधान करणे म्हणजे आरशात बघून स्वतःलाच साळसूदपणे नमस्कार करणं आहे.
कारण तुमचं हे विधान केवळ निरीक्षण नाही, तर स्वीकार आहे – स्वतःच्या अपयशाचं, निष्क्रियतेचं, आणि दुर्लक्षाचं!
बल्हारपूर विधानसभा क्षेत्र हे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातच येतं, आणि या लोकसभेच्या तुम्ही खासदार.
म्हणजे या मागासलेपणाच्या चित्रपटात तुमची भूमिका नायिकेची नव्हे, तर थेट निर्मात्याची आहे!
आणि म्हणूनच, ज्या कर्तृत्वाच्या झळाळीने इतर खासदार विकासाचं श्रेय घेतात,
तिथे तुम्ही मात्र स्वतःचं निकम्मेपण प्रांजळपणे कबूल करत आहात – याबद्दल मनापासून धन्यवाद!
चला तर मग, आता थोडकं “व्हिक्टरी लिस्ट” पाहूया…
- वन हक्क कायदा – कायदा आहे, पण जंगलातच हरवला. आजही अनेक आदिवासी हक्काच्या प्रतीक्षेत आहेत.
- बल्हारपूर-मुंबई थेट रेल्वे – कोविडमध्ये "टेम्पररी" बंद झाली, पण नंतर तिचं "स्थायिक विलोपन" झालं असावं, असं वाटायला लागलंय.
- बल्हारपूर-पुणे रेल्वे – तिलाही कळलं की आपण मागास भागातून जातोय, म्हणून तीही गायबच झाली.
- केंद्र पुरस्कृत रोजगार प्रकल्प – योजना पेपरवर दिसतात, प्रत्यक्षात त्या रोजगार देतात की फक्त आश्वासने, हे शोधताना आम्ही स्वतःच बेरोजगार झालो.
- गोसीखुर्द प्रकल्प – वर्षानुवर्षं "राष्ट्रीय" राहिला पण "पूर्ण" मात्र होऊ शकला नाही. पाण्याआधी राजकारण वाहायला लागलं!
- गोंदिया-चांदा फोर्ट रेल्वे – प्रवासी ओरडतात, पण सुरजागडच्या लोहाच्या डब्यांनाच जास्त महत्त्व मिळालं. लोखंड भारी पडतंय माणसांवर.
- केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी – आहे, पण ‘जमिनीवर’ कमी, ‘फाईलवर’ जास्त.
- रोजगार प्रकल्प – बल्हारपूर मतदार संघात केंद्राची रोजगार योजना दिसली काय? जमिनीवर निव्वळ बेरोजगारीचा बाजार.
- रेल्वे मालवाहतूक त्रास – प्रवाशांच्या वेदनांवर तुम्ही खूप मौन बाळगलं.
-
योजना अंमलबजावणी – तुमचं प्रतिनिधित्व असूनही केंद्राच्या योजना इथं अंमलातच नाहीत.
ताई, एक गोष्ट राहिलीच...
मूल–चंद्रपूर महामार्गावरून गाड्या नाही, तर थेट अपघात धावत आहेत.
दोन पदरी रस्ता, पण अपघात मात्र चहूबाजूंनी – हाच आमचा ‘चारपदरी’ अनुभव!
या रस्त्याने किती लोकं स्वर्गवासी झाले, हे आता रस्त्यानेच मोजावं लागेल.
पण ताई, तुम्ही मात्र ‘पद’ सांभाळण्यात इतक्या व्यग्र आहात की ‘चारपदरी’चा विचारही ‘साइड पट्टी’वर गेला.
या रस्त्यावर खड्डे आहेत, पण आमच्या अपेक्षांमध्येच खोल खड्डे पडलेत!
आणि हो, हे सर्व विकासाचे प्रश्न केंद्राशीच संबधित आहेत, सुदैवाने आपणच आमचे खासदार म्हणून जाब विचारण्यासाठी लोकप्रतिनिधी आहात!
ताई, बल्हारपूरच्या गल्ल्यांमध्ये आता तुमचं नाव घेताना लोक म्हणतात,
“बरं झालं, त्यांनी तरी मान्य केलं आपल्याला कोणी वाली नाही.”
हा निष्क्रियतेचा ब्रँड तुमचं खास ओळखचिन्ह झालंय.
आणि तुम्हाला आठवते का? बिहार सारखा मागासलेपणा वर्षभरापूर्वीच मूल शहरात आम्हाला जाणवला... सार्यांनीच तो अनुभवला... राजकीय नेत्यांच्या इशार्यांवर चंद्रपूरातील गुंडानी मूलच्या एका जेष्ठ कॉंग्रेस नेत्यांवर खुलेआम पिस्तूलीतून गोळीबार करीत त्यांचा मुडदा पाडण्यांचा केलेला प्रयत्न म्हणजे मागासलेपणाचेच लक्षण समजायचे ना?
पण ताई, अजूनही उशीर झालेला नाही.
एकदा तरी हे मागासलेपण झटकून, कृतीनं प्रतिनिधीत्व सिद्ध करा.
कारण विधानं करून ‘ब्लेम शिफ्ट’ करणं सोपं आहे, पण जबाबदारी स्वीकारून बदल घडवणं हे खऱ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे.
प्रश्नाची यादी पाहून आता हे सांगू नका... की केंद्रात आमचे सरकार नाही... राज्यात आमचं कुणी ऐकतं नाही.. असं सांगणे म्हणजे स्वत:च्याच कर्तुत्व आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे नाही काय?
बाकी एक मात्र मनापासून आवडलं.. तुम्ही पाण्याच्या प्रश्नावर बैठक घेतली, 'पिण्या'चा प्रश्न सोडवितानांच पाण्याच्या प्रश्नही सुटेल असा विश्वास वाटला...
आपण 'बल्हारपूर मतदार संघाचे मागासलेपणाची दखल घेतल्यांने आम्ही कृत—कृत झालेलो आहोत. आम्हाला आता खात्री आहे, तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून 'वरोरा—भद्रावती' मतदार संघाचा जो स्वर्गालाही लाजवेल असा 'विकास' केला, तसाच विकासाची चमक आमच्या क्षेत्रालाही दिसेल!
तोपर्यंत आम्ही म्हणत राहू…
थँक्यू ताई!
तुमच्या बोलण्यामुळे आम्हाला कळालं, आम्ही का मागासलेलो आहोत – कारण आमच्या खासदारांनीच ते मान्य केलं आहे!
आपलाच –
एक मागास मतदार
(आणि जागृत पत्रकार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!