आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विशेष उपस्थितीत मुल शहरात स्वातंत्र्यदिनी सायंकाळी 4 वाजता भव्य तिरंगा यात्रा



सर्व देशभक्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन 



मूल,  देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रभक्तीचा उत्साह जागविण्यासाठी मूल शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता रेस्ट हाऊस रोडवरील रामलीला भवन येथून या तिरंगा यात्रेला सुरुवात होणार असून, शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत यात्रा गुजरी चौकात पोहोचणार आहे.
या तिरंगा यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे तब्बल 1000 फूट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज असणार आहे. देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याच्या अमृतभावनेचा संदेश देणाऱ्या या यात्रेत शहरातील युवक-युवती, महिला,व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व समाजघटक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यात्रेदरम्यान भारतमातेचा जयघोष, राष्ट्रगीत व देशभक्तीपर घोषणांनी मूल शहराचा परिसर दुमदुमणार असून, नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘एक तिरंगा, एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात येणार आहे.
तिरंगा यात्रा गुजरी चौकात पोहोचल्यानंतर तेथे माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संबोधनाने यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी ते उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करणार असून, स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांची भूमिका यावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.
स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. त्यामुळे या ऐतिहासिक दिवशी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत मूल शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विशेषतः युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तिरंगा यात्रेचे वैभव वाढवावे, तसेच शहरातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, विविध संघटना आणि देशप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : रामलीला भवन, रेस्ट हाऊस रोड, मूल
यात्रेचा मार्ग : रामलीला भवन ते गुजरी चौक
दिनांक : शनिवार, १५ ऑगस्ट २०२६
वेळ : दुपारी ४.०० वाजता
विशेष आकर्षण : 1000 फुटाचा लांबीचा भव्य तिरंगा
समारोप : गुजरी चौक येथे माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संबोधनाने
“तिरंगा आपल्या अभिमानाचा, स्वातंत्र्य आपल्या रक्तातला आणि राष्ट्रप्रेम आपल्या मनातले!”
या भावनेने मूल शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन तिरंगा यात्रा सन्मान समिती ने आव्हान केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!