जोरगेवारांमुळे 'बल्हारपूर'चा पेच वाढला!

जोरगेवारांमुळे 'बल्हारपूर'चा पेच वाढला!



चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचा 'पक्ष प्रवेशा'चा तिढा अद्याप सुटला नाही.  कुण्याही राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आमदार जोरगेवार यांना स्विकारण्यास तयार नाही.  मागील काही दिवसापासून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचेशी चर्चा करून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून, तुतारी घेवून लढणार असल्यांचे स्पष्ट झाले होते.  पक्ष प्रवेशाचा मुहूर्तही ठरला. किशोर जोरगेवार तुतारीवर लढणार अशा बातम्याही झळकल्या.  मात्र स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, किशोर जोरगेवार यांना पक्षात स्विकारण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहीती आहे.  पक्षानी चंद्रपूर ऐवजी बल्हारपूरचीच विधानसभा लढवावी अशी आग्रही मागणी या नेत्यांनी शरद पवार यांचेकडे लावून धरली.  यामुळे, किशोर जोरगेवार यांना, शरद पवार यांनी, 'कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा करून पक्ष प्रवेशाबाबत निर्णय घेवू' असा निरोप देत, अप्रत्यक्ष त्यांना पक्षात प्रवेश नाकारले असल्यांचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही चंद्रपूरच्या सहा इच्छूक कॉंग्रेस उमेदवारांना घेवून, चंद्रपूरची जागा कॉंग्रेसनेच लढवावी यासाठी लॉबींग सुरू केले आहे.  पाच महिण्यापूर्वी, ज्या किशोर जोरगेवारांनी, आपल्या विरोधात भाजपाचा प्रचार केला, त्यांचेसाठी आम्ही मते कशी मागायची? असा तार्कीक प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यांने, चंद्रपूरचा घोळ कायम आहे.
चंद्रपूरचा तिढा न सुटल्यांचा फटका बल्हारपूर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवितांना कॉंग्रेसला बसत आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हयात एकतरी जागा लढवावी आणि ती बल्हारपूरची असावी अशी आग्रही मागणी केली आहे.  यासाठी त्यांनी वरिष्ठांकडे तगादा लावला आहे. चंद्रपूरची जागा कॉंग्रेसने लढविल्यास, बल्हारपूची जागा राष्ट्रवादीला सोडणे आवश्यक असल्यांने, बल्हारपूरचा पेच आणखी गडद झाला आहे. 

बल्हारपूरची जागा आम्हालाच मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत, पक्षाकडे तशी मागणी केली आहे अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमीत समर्थ यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.

बल्हारपूर मधून, शिवसेनेने दावा सोडल्यांने, संदीप गिर्हे रिंगणाबाहेर झाले आहेत.  महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे संतोष रावत आणि डॉ. अभिलाषा गावतुरे यांचेत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे.  अशातच, राष्ट्रवादीने आपला बल्हारपूरवरून दावा कायम ठेवल्यांने, बल्हारपूरचा सस्पेंस वाढला आहे.  राष्ट्रवादीकडून राजेंद्र वैद्य किंवा दिपक जैस्वाल ही निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.  अलिकडेच युतीच्या ट्रेंडमध्ये 'पक्ष माझा, उमेदवार तुमचा' असा प्रयोग येथे झाल्यास, तुतारी घेवून कॉंग्रेसचा उमेदवारही रिंगणात राहू शकतो.

आमदार जोरगेवार यांचा राष्ट्रवादी प्रवेश सुकर झाला असता तर, बल्हारपूर कॉंग्रेससाठी खुले मैदान होते, मात्र जोरगेवार यांचेमुळे बल्हारपूरचा पेच वाढला आहे.

सुधीर मुनगंटीवार जोरात—कॉंग्रेसचा प्रचार कोमात!

भाजपाचे नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी, भाजपाने जाहीर केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून त्यांनी बल्हारपूर मतदार संघात प्रचाराला सुरूवात केली आहे.  लोकसभेचा अनुभव लक्षात घेवून, मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या निवडणूकीकरीता, कार्यकर्त्यावर अधिकचा भरोसा ठेवण्याऐवजी, नियोजन आणि प्रचाराची धुरा स्वत:कडेच घेतल्याचे दिसून येत आहे.  ते आता थेट मतदारांच्या संपर्कात असल्यांने, लोकसभेत निर्माण झालेले चित्र बदलत असून, मुनगंटीवार यांना ही निवडणूक आता जड जाणार नाही अशी चर्चा मतदार संघात सुरू आहे. त्यांनी विविध मेळाव्यासह, जिल्हा परिषद स्तरावरचे कार्यकर्ते मेळावे घेणे सुरू केले असून, प्रचार यंत्रणाही कामाला लावली आहे.  दुसरीकडे, 45 हजाराची लोकसभेत आघाडी घेवूनही कॉंग्रेसला या मतदार संघात अद्याप सुर सापडला नाही याचाच फायदा घेत मुनगंटीवार आपली चाल जोमात चालत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!