मुल येथील मालधक्का शहराबाहेर हलवावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश.
मुल येथील मालधक्का शहराबाहेर हलवावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश.प्रदूषण होणार नाही अश्या जागेची निवड करावीरेल्वेच्या उच्चाधिका-यांसह घेतली बैठक.
मुल शहरात होणारा मालधक्का हा सर्वांना मान्य असणा-या जागेवर, विशेषतः प्रदुषण न होणारी जागा निवडून त्याठिकाणी करण्यात यावा, याप्रकरणी लोकभावनेचा आदर करावा, असे निर्देश चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या उच्चाधिका-यांना दिले.
दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहरातील मालधक्का शहराबाहेर हलविण्याच्या नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने रेल्वे विभागाच्या उच्चाधिका-यांसह वनभवन नागपूर येथे बैठक घेतली. या मालधक्क्यामुळे मुल शहरातील नागरिकांना मोठया प्रमाणावर प्रदुषणाचा सामना करावा लागणार आहे. यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात टोलेवाही-केळझर-भगवानपूर या रस्त्यालगतच्या जागेला भेट देत पाहणी करावी व जनतेला व नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागू नये अशा पध्दतीची जागा मालधक्क्यासाठी निवडावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
मुल शहरामध्ये मालधक्का झाल्यास शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू होईल आणि यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यामध्ये येईल, प्रदूषण वाढेल, अपघाताचे प्रमाण वाढतील त्यामुळे मालधक्का हटाव अशी मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम मुल येथील युवकांनी मूक मोर्चा काढला, त्यानंतर मुल शहर बचाव संघर्ष समितीने एडवोकेट बाबासाहेब वासाडे यांच्या मार्गदर्शनात शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांचा प्रचंड मोठा मोर्चा काढला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा महिला व पुरुषांचा मोर्चा काढला. मॉर्निंग गृप ने सुद्धा मूक शांती आंदोलन केले. तसेच विविध संघटनांनी आपापल्या परीने सुद्धा निवेदन दिले. या सर्वांची एकत्रित फलश्रुती म्हणून जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मूल येथील मालधक्का हटाव या आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे प्रशासन व मूल शहर बचाव संघर्ष समितीने आणि भाजपा पदाधिकारी यांची संयुक्त सभा "राजा हरिसिंग वनसभागृह, सेमिनरी हिल्स, नागपुर" येथे आयोजित करण्यात आलेली होती. या सभेमध्ये चंद्रपुरचे जिल्हाधिकारी, रेल्वेचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सुधीरभाऊंनी सर्व अधिकार्यांना स्पष्ट सूचना दिल्या की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुल येथे मालधक्क्याचे काम सुरू करण्यात येऊ नये व सध्या सुरु असलेले काम बंद करण्यात यावे. तसेच भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या संध्याताई गुरनुले व मूल शहर बचाव संघर्ष समितीचे श्री विजय सिद्धावार यांना सोबत घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी मालधक्का स्थानांतरित करण्यासाठी दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा तसेच नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेवून मूल शहरातून अवजड वाहतूक होणार नाही याची काळजी घ्यावी व तसा अहवाल शासनाला सादर करावा, अशा सूचना दिल्या.
दिनांक ७ किंवा ८ ऑक्टोबरला जागेची पाहणी करण्यात येईल व त्याअनुषंगाने योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन रेल्वेचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक श्री. सुर्यवंशी यांनी दिले. यावेळी वरिष्ठ विभागीय प्रबंधक श्री. गर्ग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने, मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांच्यासह मूल येथील भाजपा पदाधिकारी, मूल बचाव संघर्ष समितीचे सदस्य, गुडमार्नींग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!