चिनी मालावर बहिष्कार करू या...स्वदेशी ला स्विकारूया

चिनी मालावर बहिष्कार करू या...स्वदेशी ला स्विकारूया

◆ भारतीय सीमेवरील चीन च्या विघातक कृत्यावर विशेष लेख-


■ लेखिका-
सौ.यशोधरा सोनेवाने गोंदिया

◆ संकलन- अतुल खोब्रागडे/गोंदिया

भारतीय सीमेवर भारतीय जवानांची हत्या, सैनिकांच्या जीवितास हानी पोहचविणा-या, घुसखोरी करणा-या, हिंदी-चीनी भाईभाई म्हणून विश्वासघात करणाऱ्या चीनविरोधात भारतीय नागरिक आता पेटून निघाला आहे. अशा भारतीय सैन्यासाठी जे म्हणतात ,? " आम्हाला खंत आहे की, आपल्या देशाला देण्यासाठी फक्त एकच जीवन आहे" अशा मरमिटणा-या सैनिकासाठी तरी चीनी वस्तूचा वापर टाळून स्वदेशीचा वापर करूया.

आज सर्वत्र एकच मँसेज खूप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे." चिनी वस्तूवर बहिष्कार"
कोरोना व्हायरस जगात पसरवल्या मुळे चीनने जगातील गरीब तसेच प्रगत देशांवर देखील, असह्य वेळ आणली…कोरोना टेस्ट किट पुरवताना देखील त्यांनी इतर देशांना निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवले,फसवणूक केली. त्यांची या कठीण काळात त्यांनी युरोप अमेरिका सह अन्य देशांशी असलेली व्यापारी महत्वकांक्षा साध्य केली.

आपल्या देशातील सर्व सणांची माहिती असल्यामुळे हे चीनी लोक सिझन नुसार बिझनेस करतात. संक्रात आली की पतंग मांजे, होळीच्या वेळी पिचकाऱ्या, गणेशोत्सवाच्या वेळी डेकोरेशन साहित्य. तर दिवाळीच्या वेळी पणत्या, शोभेच्या वस्तू आणि आकाशकंदील या सर्व वस्तु पुरवून चिनी लोक आपल्या व्यापाराचे उद्दिष्ट साध्य करताय. आणि आपली बाजारपेठ काबीज करत आहेत.
त्यांच्या स्वस्त आणि मस्त किमतीमुळे आपल्या इथे ही हे सर्व प्रॉडक्ट्स चांगलेच लोकप्रिय आहेत.चिनी वस्तूंच्या टिकाऊपणावर नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते…! पण ते प्रॉडक्ट्स फक्त क्वांटिटी साध्य करतात क्वालिटी नाही.हे मात्र 100%
खरे आहे. म्हणूनच आपण आता मेड इन चायना ऐवजी मेड इन इंडिया वस्तुंवर भर देणे आवश्यक आहे. हे तर आपल्या सर्वांसाठी फायदेशीर ठरेल. भारतीय बनावटीच्या वस्तू नेहमीच या वस्तूंपेक्षा टिकाऊ आणि चांगल्या प्रतीच्या असतात.

सध्या जगभरातील अर्थव्यवस्था धोक्यात आल्या आहे. या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी इंपोर्टेड च्या ऐवजी स्वदेशी वस्तू वापरणे तेवढेच गरजेचे ठरेल.यामुळेच आपल्या देशातील गृहोद्योग, लघुद्योग यांना चालना मिळेल.

        आता आपल्या देशातील लोकांनी पण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपल्या भारतीय बाजारातच पैसा खर्च केला तर त्याने आपल्याच देशाची तिजोरी भरेल. देशातला पैसा देशातच राहील…!
सध्या भारतीय बाजारपेठ बऱ्याच अंशी चीनी उत्पादनांनी काबीज केली आहे. आपण सर्वांनी लवकर जागं होऊन या संधीच सोन केलं पाहिजेच.
देशातल्या व्यापाऱ्यांनीच चिनी माल न स्विकारता त्याला तीव्र विरोध केला पाहिजे. म्हणजे व्यापाऱ्यांनी नाकारल्यामुळे त्या वस्तू नगरिकांपर्यंत पोहोचनारच नाही. तसेच सोशल मिडिया ने चायनीज वस्तूच्या जाहिरातीवर त्वरीत बंदी आनावी.आणि स्वदेशी वस्तूंच्या जाहिराती वर भर द्यावा. जेणेकरून भारतीयांना स्वदेशी मालाची माहिती मिळेल.

      चिनी वस्तूंच्या विरोधाला सुरूवात झालेली आहे. सध्या टिक टॉक ला पण प्रचंड विरोध चालला आहे. अनेक देशांनी या अँप च्या प्रायव्हसी च्या कारणामुळे त्याला आधीच बॅन केलं आहे.या अँपमुळे  आपली पर्सनल माहिती आपणहून आपण दुसऱ्या देशांना पुरवतोय. याचा वाईट उपयोग सुद्धा लोकं करू शकतात . त्यामुळे सावधानता म्हणून असे
ऍप वापरणं बंद केलं पाहिजे.
टिक टॉक सारखेच फीचर्स असणारे अँप सुद्धा प्ले स्टोर वर उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनी आपण भारतीय वस्तू वापरायला सुरवात केली पाहिजे म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थतेला तो एक चांगला आधारस्तंभ ठरेल…!
स्वातंत्र्यापूर्वी देखील आपल्या लढ्यात स्वदेशी वर भर दिला होता. स्वदेशी वस्तू वापरून लोक त्याकाळी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देत होते.आपली देशाप्रती असलेली निष्ठा दाखवत होते. आता त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. म्हणूनच सध्या तरी एकच नारा… स्वदेशी वापरा आणि देश वाचवा…

सध्या देश बिकट आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. जागतिक मंदी, देशांतर्गत महागाई आणि असमतोल आर्थिक विकास अशा संकटांना तोंड देऊन आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखणे हे खुप मोठे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाताना महात्मा गांधी यांच्या विचारांचा काही उपयोग होऊ शकेल का? देशाची स्वातंत्र्यपूर्व आर्थिक परिस्थिती आजच्या परिस्थितीपेक्षा फार वेगळी होती. स्वातंत्र्य हे प्रथम लक्ष्य असल्याने आणि बहुसंख्य जनता साक्षर नसल्याने महात्मा गांधींनी आर्थिक विकासापेक्षा उच्च सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये स्थापित करण्यावर आपल्या विचारांत भर दिल्याचे दिसून येते; मात्र तरीही या मूल्यांवर आधारित आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काही कालातीत विचार स्पष्टपणे मांडले आहेत.

   ‘खेड्यांकडे चला’ हा गांधीजींचा महत्त्वाचा संदेश होता. त्या काळीही आजच्यासारखीच ग्रामीण अर्थव्यवस्था महत्त्वाची होती. आजही देशातील बहुसंख्य जनता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. देशाची आर्थिक प्रगती कृषी ग्रामीण विकासावर अवलंबून आहे. कृषी ग्रामीण क्षेत्रातील उत्पादकता, गुंतवणूक, रोजगार निर्मितीचे महत्त्व या संदेशातून गांधीजींनी अधोरेखित केले होते. त्यांच्या कल्पनेप्रमाणे जर प्रत्येक गाव स्वयंपूर्ण झाले तर भारताला फार मोठा आर्थिक विकास साधणे  सहज शक्य होईल. शहरी भागातील विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण खेड्यांकडे गेले पाहिजे. ग्रामीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे महत्त्व  महात्मा गांधींजीनी स्वातंत्र्यापूर्वीच सांगितले होते.      खेड्यातील"‘स्वदेशीची ढोबळ परिभाषा ही आहे की, देशी उद्योगांना संरक्षण देण्याकरिता विदेशी वस्तूंचा त्याग करून देशी वस्तू वापरणे. ही गोष्ट त्या उद्योगांवर विशेषत्वाने लागू होते, ज्यांच्या विनाशामुळे भारत दारिद्र्यावस्थेत पोहोचला.’’ सरकारलाच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला किती सुंदर विचार गांधीजींनी देऊन ठेवला आहे! गांधीजींना केवळ धार्मिक आणि सामाजिक क्षमताच अपेक्षित होती असे नाही, तर आर्थिक समतेविषयीसुद्धा त्यांनी विचार केला होता. भारतात सर्व धर्मांतील व जातीतील भेद दूर करण्याचे त्यांचे स्वप्न होतेच; परंतु देशात सर्वांना समान आर्थिक स्वातंत्र्य असावे, असाही त्यांचा आग्रह होता. ‘‘प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवन निर्वाहाकरिता पुरेसे काम मिळाले पाहिजे. या आदर्शाची प्राप्ती तेव्हाच होऊ शकेल ,जेव्हा जीवनाच्या मूलभूत गरजांची उत्पादन साधने सर्वसामान्य जनतेच्या ताब्यात असतील. या साध्या-सरळ सिद्धांताची अवहेलना हे आपल्याच देशातील नाही तर सर्व जगातील दारिद्र्याचे कारण आहे.  "रोजगार हाच दारिद्र्यनिर्मूलनाचा उपाय आहे."

चायनीज वस्तूंच्या वापर टाळण्यासाठी 
सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे जनप्रबोधन हे आहे. आणि त्यासाठी विपुल साहित्य आणि ऑडिओ व्हिडिओ कॅसेट तयार गेली पाहिजे. विविध ठिकाणी व्याख्याने, प्रशिक्षण शिबिरे इत्यादी सुरू करण्यात यावे. स्वदेशी वस्तू स्थानिक पातळीवर मिळाव्यात म्हणून स्वदेशी स्टोअर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला पाहिजे तेव्हाच लोकांच्या पसंतीस उतरु लागले. अशी गावं जिथे केवळ पेप्सी कोला, कोलगेट यासारख्या परदेशी कंपन्यांची उत्पादने विकली जाणार नाहीत तर शेतीही मूळ आणि रासायनिक खते आणि संकरित बियाण्याशिवाय  शेती केली जाईल.
अशी व्यवस्था प्रत्येक शाषनाकडून अपेक्षित आहे.लवकरच राष्ट्रपती वा उपराष्ट्रपती यांच्या हस्ते  "एलिमेंट ॲप्स"चे उद्घाटन होणार आहे .या ॲप्सवर टेस्टिंग सुरू आहे. आपणही हा "एलिमेंटॲप्स "ला प्ले स्टोरमधून डाउनलोड करून वापर करावे. भारताला आत्मनिर्भर  बनविण्यासाठी आपल्या खारीचा वाटा उचलावा. AOL चा स्त्यृत उपक्रम  आपल्या भारतीय , तरूण पिठीला नक्कीच आत्मनिर्भरतेकडे नेणारा हा उपक्रम ठरणार यात तिळमात्र शंकेला वाव नाही. जय गुरूदेव. AOL द्वारे प्रत्येक गावागावात 5-5  चे गट तयार करून सेवायोद्धा तयार आहेत. जे स्वयंप्रेरणेने गावाला व स्वतःला  आत्मनिर्भर बनवित आहेत.
---------------------------------------
लेखिका - 
सौ. यशोधरा महेन्द्र सोनेवाने 
गोंदिया 
मो. 9420516306


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!