चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटलीच पाहिजे! विधानसभा निवडणुकीत मानवतावादी पक्षाची भूमिका
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटलीच पाहिजे!
विधानसभा निवडणुकीत मानवतावादी पक्षाची भूमिका
निवडणूक जाहीरनामा बनला चर्चेचा विषय
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला आहे, सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंग आहेत, असे असतांनाच चिमूर विधानसभा निवडणुकीतील मानवतावादी पक्षाचे वतीने प्रसिध्द झालेला जाहीरनामा चर्चेचा विषय ठरला आहे,"चंद्रपूर जिल्ह्यात असलेली दारूबंदी हटलीच पाहिजे" या एकमेव मुद्द्यावर या पक्षाच्या उमेदवार सौ.वनिता जितेंद्र राऊत हया निवडणूक लढवीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात अनेकांची संसार उध्वस्त होत असल्याची कारणे पुढे करून सामाजिक संघटनांच्या दबावाखाली चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली, मात्र ही दारूबंदी फसवी असून स्वस्त दरातील दारु महाग झाली, सोबतच विषारी दारूचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात यावी अशी चर्चा सर्वच राजकीय पक्ष्यासह सत्ताधारी पक्षाचे नेत्यांना वाटते,मात्र ते उघडपणे बोलताना दिसत नाही, या संदर्भात अखिल भारतीय मानवतावादी पक्षाने भूमिका घेतल्यामुळे त्यांचे खाजगी चर्चेत अभिनंदन केले जात आहे.
अखिल भारतीय मानवतावादी पक्षाने "चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटलीच पाहिजे" असा जाहीरनामा प्रकाशित केला आहे.तो जाहीरनामा "व्हॉट्स अँप" व "फेसबुक"वर फिरत आहे, यावर या भागात उलट-सुलट होत असलेल्या चर्चेत समर्थकांची संख्या मात्र प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे.
"आमदार झाल्यावर गावोगावी दारूविक्रीचे परवाने देणार,त्याकरिता चंद्रपूर जिल्यातील दारूबंदी हटलीच पाहिजे"असा स्पष्ट उल्लेख जाहीरनाम्यात करण्यात आला आहे, चिमूर विधानसभा मतदारसंघातील जनतेला कायदेशीर मार्गाने पिण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त झाला पाहिजे, दारूबंदी केल्यानंतर समाजात सुधारणा होईल असे ज्यांना वाटत होते त्यांनी गेल्या काही वर्षाचा अनुभव बघावा असा दावा करीत मानवतावादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र सहारे पुढे म्हणाले,समाजाचा अभ्यास केल्यास दारू पिणे ही सामाजिक प्रथा आहे, जोपर्यंत दारुबंदीला समाज मान्यता मिळत नाही, तोपर्यंत दारुबंदी प्रत्यक्ष अमलबजावणी अश्यक्य आहे.दारुबंदीने लोकांना चोरून लपून दारू पिण्यास व विकण्यास भाग पाडले आहे,या भागातील जनतेला चोरून लपून व दुप्पट तिप्पट दराने दारू पिताना बघून आमच्या पक्षाला फार दुःख होते, आम्हाला वाटते जबरदस्तीने दारुबंदी हे पाप आहे असे जितेंद्र राऊत म्हणाले.
भाजप-शिव सेना युती सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल२०१५ पासून दारुबंदी केली. मधल्या काळात दारूबंदी उठविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती, या विषयावर मोठे राजकारण सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत या मुद्द्यावर प्रचार करण्यात आला होता. जिल्ह्यात हे सर्व सुरू असताना राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला आहे, चिमूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार सौ.वनिता जितेंद्र राऊत यांनी "दारूबंदी झालीच पाहिजे", आमदार झाल्यावर गावोगावी दारू विक्रीसाठी परवाने देऊन बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार,अश्या आशयाचे पत्रक प्रसिध्द केले. या पत्रकाची चिमूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चविष्ट चर्चा सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!