सृष्टीच्या निर्मितीमागचे गूढ उकलण्यासाठी अवघे आयुष्य समर्पित केलेले ख्यातनाम भौतिक शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग

 ख्यातनाम भौतिक शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग
सृष्टीच्या निर्मितीमागचे गूढ उकलण्यासाठी अवघे आयुष्य समर्पित केलेले ख्यातनाम भौतिक शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे असाध्य व्याधीने चाकांच्या खुर्चीला खिळलेले शरीर काही दिवसांपूर्वी कालवश झाले. ‘माझ्या मृत्यूनंतर मी सुपरमॅनप्रमाणे सूक्ष्म गुरुत्वलहरींमध्ये विहरत राहीन’, असे डॉ. हॉकिंग यांनी ‘नासा’च्या अंतराळवीरांना सांगितले होते. कृष्णविवरे आणि सापेक्षतावादाच्या सिद्धांतावर आयुष्यभर संशोधन करणारे डॉ. हॉकिंग हे केवळ एकांत-वासी नव्हते. पन्नासहून अधिक वर्षे सारे नियंत्रण गमावून बसलेल्या विकल शरीरासोबत जगताना त्यांच्या वृत्ती प्रफुल्लित होत्या आणि विज्ञानापलीकडल्या जगाविषयीचे कुतूहलही ताजे होते!
डॉ. हॉकिंग यांनी मांडलेल्या सिद्धांतांमधले गूढ उलगडणे सामान्यांच्या आवाक्यापलीकडचे असले, तरी आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या विषयांवर डॉ. हॉकिंग यांनी व्यक्त केलेली मते विलक्षण रोचक आहेत.
‘न सुटणारे क्लिष्ट प्रश्न मी आयुष्यभर सोडवत आलो. ही पृथ्वी कशी अस्तित्वात आली यासारखे प्रश्नही मी समाधानकारकपणे हाताळले; पण एक कोडे मात्र मला अजून उलगडलेले नाही’ - असे एक विधान त्यांनी सत्तराव्या वाढदिवशी केले होते. त्यावर डॉ. हॉकिंग यांना प्रश्नकर्त्यांनी उत्सुकतेने विचारले, ‘कोणते कोडे?’... तर ते हसून म्हणाले, ‘स्त्री!’
अलीकडच्या काळात विविध प्रसारमाध्यमांना डॉ. हॉकिंग यांनी दिलेल्या मुलाखतींदरम्यान त्यांनी मांडलेल्या विचारांचे हे साभार संकलन.
देव या संकल्पनेवर माझा विश्वास आहे का, असे सातत्याने मला विचारले जाते. देवाची ‘संकल्पना’ ही माणसाची गरज असते, हे मला जाणवते. पण आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे ही गरज संपली आहे, असे मी मानतो. आपण राहतो त्या पृथ्वीचे, वावरतो त्या विश्वाचे रहस्य काय, हे समजून घेण्यासाठी भौतिकशास्त्राचे नियम आणि सतत उन्नत होत जाणारे या शास्त्राचे ज्ञान पुरेसे उपयुक्त आहे. त्यासाठी या जगाचे नियंत्रण करणारी कुणी अदृश्य शक्ती आहे, असे मानण्याची, मानत राहण्याची गरज नाही.
गेली कित्येक वर्षे मी विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य शोधण्यात व्यग्र आहे. या अभ्यासाअंती माझे असे स्पष्ट मत झाले आहे की, परमेश्वर नावाची कुणी शक्ती अस्तित्वात नाही. ...मी परमेश्वर मानत नाही.
आपण जगात असण्याच्या हेतूलाच लोक देव असे नाव देतात. पण हा हेतू एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिप्रतिमा असण्याऐवजी प्रत्यक्षात ते भौतिकशास्त्राचे नियमच आहेत, असे मी म्हणेन.
याचा अर्थ माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत का? - तर नाही. तसे झाले तर माझ्या जिवंत राहण्याचे काही प्रयोजनच उरणार नाही.
हे विश्व का अस्तित्वात आले आणि कशामुळे अस्तित्वात आहे यामागची कारणे आपण आधुनिक विज्ञानाच्या आधाराने शोधू शकलो, तर तो मानवी कार्यकारणभावाचा सर्वात मोठा विजय असेल.
आपला कोणी निर्माता नाही, आपल्याविना कोणी अन्य त्राताही नाही. म्हणजे स्वर्ग नावाचे काही नाही, नरक नाही आणि मृत्यूनंतरचे जीवन नामकही काही नाही.
- जे काही आहे आणि नक्की आहे ते म्हणजे आपल्याला मिळालेले जीवन! आपल्या वाट्याला आलेला या पृथ्वीवरचा वेळ. तो अमूल्य आहे.
...आणि त्याबाबत माझ्या मनात अपार कृतज्ञता आहे!
काही माणसे नियतीवादी असतात. आपले जगणे कसे असेल, हे नियतीने आधीच लिहून ठेवलेले आहे याविषयी त्यांना खात्री असते. पण अशी माणसे रोजच्या आयुष्यात साधा रस्ता ओलांडतानाही मध्ये थांबून दोन्हीकडे नीट पाहतात आणि मगच पाऊल उचलतात, हे मी पाहिले आहे.
- हा नियतीवाद माणसाने मानावा असे कोणतेही एक कारण माझ्या आजवरच्या अभ्यासात मला कधीही गवसलेले नाही.
माणूस मरतो म्हणजे काय होते? - तर आतले सुटे भाग बिघडून कॉम्प्युटर बंद पडावा तसे शरीराचे यंत्र बिघडून काम करणे थांबवते. अशा बंद पडलेल्या जुनाट यंत्रांसाठी ‘स्वर्ग’ नसतो. अंधाराला घाबरणाऱ्या माणसांनी स्वत:ला दिलासा देण्यासाठी तयार केलेल्या त्या परिकथा आहेत.
मी मृत्यूला घाबरत नाही; पण मला मृत्यूची घाईदेखील नाही. तो येण्याआधी करण्यासारखे खूप काही माझ्या यादीत शिल्लक आहे आणि ती यादी रोज वाढतच असते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणूस विरुद्ध रोबो
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हा मानवी प्रज्ञेच्या इतिहासातला सर्वोच्च (आणि दुर्दैवाने अखेरचा ठरू शकेल असा) महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनियंत्रित विकास मानव जातीचे अस्तित्व संपवू शकतो, असे मला खात्रीने वाटते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास वेगाने होत राहिला, तर कालांतराने तो स्वत:ची एक गती पकडेल आणि त्याद्वारे मानवी बुद्धी, मानवी कौशल्ये यावर मात केली जाईल. याचे कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये स्वत:च स्वत:ला विकसित करत राहण्याचे तंत्र सामावलेले असेल. त्यातून या प्रकारच्या बुद्धिमत्तेची पुनर्निर्मिती होत राहील..
संगणकाच्या व्यवस्था कोलमडून टाकणारे व्हायरस माणूस डिझाइन करू शकतो, त्याच न्यायाने स्वत:च स्वतंत्रपणे विकसित होणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रारूपही माणूस तयार करू शकेल. तसे झाल्यास त्यातून मानवाच्या सहभागा/हस्तक्षेपा/ नियंत्रणाखेरीजचे संपूर्णत: नव्या स्वरूपाचे जीवनच आकार घेऊ शकेल.
येत्या शंभर वर्षांत संगणक माणसाला ‘ओव्हरपॉवर’ करतील, याविषयी मला शंका वाटत नाही. असे होईल तेव्हा निदान मानवी वंश आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने समृद्ध संगणक यांची अंतिम उद्दिष्टे तरी निदान एकसारखी, किमान परस्परपूरक असतील, इतपत घडले तरी पुरे!

माणसाने शोधायला हवे नवे घर
हे विश्व नष्ट होईल का आणि नष्ट झाले तर त्यानंतर काय, असे प्रश्न मला सातत्याने विचारले जातात. माझ्या मते, विश्वाची व्याप्ती अजूनही वाढत आहे आणि ती वेगाने वाढत आहे. आपले विश्व वाढत जाईल तसतसे ते रिकामे आणि अंधकारमयही होऊन जाईल.
विश्वाला अंत जरी नसला तरी त्याला आरंभबिंदू होता आणि तो बिग बँगमध्ये होता. मग त्याच्याआधी काय होते असे कोणी विचारले, तर बिग बँगच्या आधी काही नव्हते, असेच मी म्हणेन.
अंतराळात अधिकाधिक विस्तार आणि नव्या वसाहती करण्यासाठी आपली मानवी संस्कृती शिल्लक राहील का? - या सूर्यमालेत अन्य ठिकाणी वसाहती तयार करेपर्यंत मानव वंश जिवंत राहील, असे मला वाटते.
पण मानवी वस्तीसाठी पृथ्वीइतकी अनुकूल जागा सूर्यमालेत नाही हे नक्की. म्हणून तर मानवाला अनुकूल अशी परिस्थिती पृथ्वीवर नसती तर आपण जगलो असतो का, हा प्रश्न आहेच.
जगाची लोकसंख्या वाढण्याची गती पाहता पृथ्वी मानवाला फार काळ पुरी पडणार नाही, हे मला दिसते. मानव वंश हा या विश्वातला सर्वात प्रगत घटक असेल, तर त्याने जिवंत आणि जगत राहणे अर्थातच महत्त्वाचे आहे. पण आपण आता स्वनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचलो आहोत. हा नाश पर्यावरणाचा विध्वंस किंवा अणुयुद्ध अशा कशानेही होईल; पण होईल हे नक्की! असे काहीही अभद्र न घडता आहे हे असेच चालत राहील आणि अनादिकाळ पृथ्वी आहे अशीच राहील, हे मला शक्य दिसत नाही.
त्यामुळे विनाशाचा तो क्षण येण्याआधीच माणसाने पर्याय तयार करून ठेवावा हे बरे!
आपल्याजवळची सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवणे धोक्याचे असते.
- माणसाने फक्त पृथ्वीच्या भरवशावर जगत राहणे हेही धोक्याचेच आहे!


खुर्चीला खिळून असल्याचे सुख
वयाच्या एकविसाव्या वर्षापासून मला चाकांच्या खुर्चीला खिळवून ठेवणारे अपंगत्व हा माझ्या मार्गातला अडथळा ठरला का? - या प्रश्नाचे उत्तर वरवर दिसते इतके सोपे नाही.
अपंगत्व दुर्दैवी आहे हे मान्य;
पण उरलेल्या अनेक बाबींमध्ये मला आयुष्याने उत्तमच साथ दिली. थिआॅरिटीकल फिजिक्स हा माझ्या अभ्यासाचा विषय. त्यात माझे अपंगत्व हा अडथळा नव्हता.
ज्यात आपले अपंगत्व आड येत नाही असे आयुष्यात अनेक पर्याय असतात, हे माझ्यासारख्या अपंगांनी नजरेआड होऊ देता कामा नये.
माझा अभ्यास-विषय हा असा ‘उत्तम पर्याय’ ठरला. खुर्चीला खिळल्याने मी माझ्या विषयात तासन्तास बुडी मारून सुखनैव राहू शकतो.
मला बोलता येत नाही.
यंत्रांच्या आधाराने माझे बोलणे खूप संथ असल्याने मी गप्पांमध्ये मागे पडलो, की मी आपोआप माझ्या माझ्या जगात रमून जातो. मग कृष्णविवरांच्या रहस्यात माझे मन विहरत राहते.
हे उत्तमच आहे की!
एरवी वर्गात शिकवणे, सभा गाजवणे, कंटाळवाण्या कमिट्यांवर कामे करणे असल्या भानगडी उगीचच माझ्या गळ्यात पडल्या असत्या. त्यातून वाचलो, हे बरेच!!

‘माहिती’नामक अस्रावर कब्जा
आजचे डिजिटल विश्व गूगल आणि फेसबुक या दोन कंपन्यांनी व्यापले आहे. अख्ख्या जगाला कवेत घेणाऱ्या ‘माहिती’नामक अस्रावर अशा अगडबंब आकाराच्या मोजक्याच मोठ्या कंपन्यांची सत्ता असणे, याची मला काळजी वाटते.
- ही स्थिती रशियासारखी आहे.
रशियात प्रावदा (सत्य) आणि इजवेत्सिया (बातमी) अशा संज्ञा होत्या. प्रावदामध्ये काहीच सत्य नाही आणि इजवेत्सियामध्ये काहीच बातमी नाही, असे विनोदाने म्हटले जात असे.
- आत्ता नेमके तेच जगभरात घडते आहे.
मोठ्या कंपन्या केवळ त्यांच्या व्यावसायिक हितांना अनुकूल अशाच माहिती आदान-प्रदानाला, चर्चाविश्वाला, चर्चाविषयांना चालना देतात. त्यांना प्रतिकूल अगर त्यांच्या हिताचे नसणारे चर्चाविषय अदृश्यच राहण्याची शक्यता मला वाटते.
- मी या प्रांतातला तज्ज्ञ नाही; पण हा माझ्या काळजीचा विषय आहे.

सामान्य माणूस आणि विज्ञान
विज्ञानाने गेल्या काही शतकांमध्ये झपाट्याने प्रगती करून मानवाला भेडसावणाºया बहुतांश प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत. पण असे असले तरीही समाजाच्या मोठ्या वर्गात विज्ञानाबद्दल अनास्था दिसते.
विज्ञान नक्की कसे काम करते हेच लोकांना माहिती नसल्यामुळे ते विज्ञानावर विश्वास ठेवायला कचरत असावेत. यामुळेच सध्या समाजात वैज्ञानिकांबद्दल आदर अत्यंत कमी झालेला आहे. ही अतिशय भयाण परिस्थिती आहे, याचे परिणाम वाईट होतील, असे मला वाटते.
विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात अगदी नाट्यमय बदल घडवून आणत आहेत; ते बदल योग्य दिशेने होत आहेत याची आपण खात्री केली पाहिजे. हे सगळे केवळ शास्त्रज्ञांच्या अंगावर टाकून सामान्य नागरिकांनी गप्प बसता कामा नये. विज्ञानाची थोडी माहिती सगळ्यांना असलीच पाहिजे.
भविष्यातल्या लोकशाही व्यवस्था नीट चालू राहाव्यात यासाठीही हे ‘भान’ सर्वांना असणे महत्त्वाचे आहे. अर्थात सगळ्यांनाच काही भौतिकशास्त्र किंवा गणिताचे सगळे ज्ञान मिळवण्यासाठीची प्रज्ञा वा वेळ असेल असे नाही.
- पण मला वाटते, लोकांना आपले विश्व कसे चालते, त्यातले आपले स्थान काय याची ढोबळ माहिती तरी असली पाहिजे.

फक्त दोन प्रश्नांचे आयुष्य का?... आणि कसे?
तुमचे ज्यांच्यावर प्रेम आहे अशी माणसे या जगात नसतील तर त्या जगाचे प्रयोजनच काय, असे मला नेहमी वाटत आले आहे. तुम्ही तुमच्या वागण्याने आणि घडवता त्या नात्यांनी तुमच्यापुरते जगण्याचे आणि विश्वाचेही प्रयोजन निर्माण करत असता.
मला पडतात त्या प्रश्नांनीच माझ्यातले औत्सुक्य जिवंत ठेवले, वाढते ठेवले आणि त्यातूनच माझ्या जगण्याचे प्रयोजन घडत गेले. वयाच्या एकविसाव्या वर्षी मोटर न्यूरॉन व्याधीने मला ग्रासले. खरे तर माझे सारे आयुष्यच शून्यावर येऊन गोठून गेले.
- पण तेथून पुढला मला मिळालेला प्रत्येक क्षण ‘बोनस’ आहे, याची जाणीव मला कायम राहिली. मनातली जिज्ञासा सतत जिवंत राहणे हे कोणत्याही समस्येवरले उत्तर असू शकते असे मला वाटते. माणसाने खाली आपल्या पावलांकडे पाहून नव्हे, तर वर आकाशात ताऱ्यांकडे पाहून चालावे. जीवन कठीणच असते.
पण मनात आणले तर तुम्ही करू शकाल अशा गोष्टी नेहमीच असतात. महत्त्व यशस्वी होण्याला नव्हे, धीर न सोडण्याला असते.
माझे शरीर वयानुसार वाढत गेले हे खरे; पण एरवी मी म्हणजे एक न वाढलेले लहान मूल आहे. मला सारखे दोन प्रश्न पडत असतात :
का? कसे?
...कधीकधी काही उत्तरे मिळतात, एवढेच!
माझी शारीरिक अवस्था गेली अनेक वर्षे कष्टप्रदच आहे. पण ती अवस्था स्वीकारून मी जमेल तसे सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. माझ्याकडे काय नाही, कोणत्या परिस्थितीमुळे मी काय करू शकत नाही, याचा विचार मी फार करत नाही.
- कारण तरीही मी बरेच करू शकतो, जे जे मी करू शकतो, ते तेवढे करण्यालाही पुरेसा वेळ माझ्याजवळ नाही.
आपल्याला मिळालेला वेळ वाया दवडणे या एकाच गोष्टीची मला चीडआहे.

कुणी असेल का तिकडे?
या सूर्यमालेत माणूस एकटाच आहे का? परग्रहवासी - एलियन्स - कुणी असतील का? ते कधी पृथ्वीवर येतील का? किंवा माणूस त्यांच्या अस्तित्वाचा शोध घेऊ शकेल का?
- माझा मेंदू गणिती पद्धतीने काम करतो. त्यामुळे परग्रहवासी कुणी असण्याची शक्यता मला गणिती तर्काने सहज आणि व्यावहारिक वाटते.
हे परग्रहवासी कुठे असतील? कोण असतील? कसे असतील? माणसापेक्षा प्रगत असतील का? - या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे मात्र आव्हान आहे.
समजा, असे कुणी पाहुणे पृथ्वीवर आले तर?
- कोलंबसाने तोवर अज्ञात असलेल्या एका नव्या भूभागाचा शोध लावून अमेरिकेच्या खंडावर पाऊल ठेवले; तेव्हा तिथल्या मूलनिवासी लोकांचे काय झाले?
- फारसे बरे नाही झाले. माणसाने हे लक्षात ठेवले पाहिजे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!