युरिया व रासायनिक खताची रक्कम देवूनही खत देण्यासाठी कृषी केंद्र संचालकाकडून टाळाटाळ
पीडित शेतकऱ्याची कृषी विभागाला तक्रार
पंचनामा झाला,अहवाल जिल्हा कृषी अधीक्षकाकडे,एक महिना लोटूनही शेतकऱ्याला न्याय नाही
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील माढेळी येथील पीडित शेतकऱ्यानी ९ जून २०२५ला बी- बियाणे सोबत युरिया खताची खरेदीसाठी बिल चुकता केले. कृषी केंद्र संचालकाकडून नगदी रकमेची पावती सुद्धा शेतकऱ्याजवळ उपलब्ध आहे .यूरिया खत उपलब्ध नसल्यामुळे दुकानदाराने नंतर देतो म्हणून सांगण्यात आले. १० सप्टेंबर २०२५ ला शेतकरी कृषी केंद्रामध्ये युरिया खतासाठी गेला असता यूरिया जुन्या भावात मिळणार नाहीत, नवीन भावात ३५० रुपये प्रमाणे खरेदी करावा लागतील असे म्हटले असल्याचा आरोप पीडित शेतकरी सुनील नारायण कोपरे यांनी केला आहे खत देण्याची वेळ असताना शेतकऱ्याला त्याच्याच हक्काचे यूरिया खत मिळत नसल्याने पिकांना खत देण्यापासून तो वंचित राहिला .त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने आपल्याला न्याय मिळावा यासाठी कृषी केंद्र संचालकाचे विरोधात तालुका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार दिली. तक्रारीनुसार कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार माढेली येथे कृषी केंद्रात जाऊन पंचनामा केला .सदर पंचनामा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक चंद्रपूर यांचेकडे पाठविण्यात आला .परंतु एक महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा नेमके पंचनामा अहवालाचे काय झाले,नेमके पाणी कुठे मुरले याबाबत शेतकऱ्यांना काही कळले नाही . पिडीत शेतकऱ्याला न्याय केव्हा मिळणार? कृषी विभाग पीडित शेतकऱ्याचा अंत किती पाहणार?कृषी अधीक्षकांकडे पंचनामा अहवाल गेला असताना ,अधिकारी एक महिन्यापासून गप्प का बसून आहे?असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून हा संशोधनाचा विषय आहे . न्यायाचे प्रतीक्षेत असणाऱ्या पीडित शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक यांचेकडून विलंब का लागत आहे ?हा प्रश्न अनुत्तरीत आहे.पीडित शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर कृषी केंद्र संचालकांची हिम्मत अजून वाढेल आणि भविष्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत राहणार. लोकप्रतिनिधींनी सुद्धा पीडित शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जिल्हा कृषी अधिक्षकांकडून न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे सर्वत्र बोलल्या जात आहे.
तालुक्यातील माढेली येथील त्रिमूर्ती कृषी केंद्रातून पिडित शेतकरी सुनील नारायण कोहपरे यांनी ९ जून २०२५ ला बी - बियाणे खरेदी सोबत 15 युरिया खत बॅग सुद्धा खरेदी केल्या.तसेच खताची रक्कम ३९९७ रुपये चुकता केले आहे. त्यावेळेस कृषी केंद्र संचालकाकडे खत उपलब्ध नसावे त्यामुळे नंतर देतो असे म्हणून म्हणून वेळ मारून नेली.त्यानंतर १० सप्टेंबर २०२५ ला शेतकरी यूरिया खत मागण्यासाठी दुकानदाराकडे गेले असता २६६ रुपये युरिया खताची किंमत असताना ३५० रुपये प्रमाणे युरिया खत बॅग्स मिळेल असे शेतकऱ्याला सांगण्यात आले .शेतकरी आगाऊ पैसे कसे देणार? त्यामुळे शेतकऱ्यांनी म्हटले की २६६ प्रती बॅग किंमत असताना मी साडेतीनशे रुपये बॅग प्रमाणे पैसे देऊ शकत नाही. सदर प्रकरणाचा पंचनामा करण्यासाठी १५ सप्टेंबरला माढेली येथे कृषी केंद्रात येऊन कृषी अधिकारी यांनी पंचनामा केला.सदर पंचनामा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक चंद्रपूर यांचेकडे पाठवण्यात आला परंतु एक महिन्याचा कालावधी होऊनही पंचनामा अहवालाचे काय झाले त्याबाबत पीडित शेतकऱ्याला अजून पर्यंत काही कळले नाही.निवडणुका आल्या की शेतकऱ्यांची मते घेण्यासाठी राजकीय नेते शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहों.शेतकऱ्यांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही असे राजकीय मंचावरून आश्र्वासित करीत असतात.परंतु एक महिन्यापासून पीडित शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत असताना कृषी अधिकारी तर गाढ झोपी गेले परंतु साखर झोपेत असणारे लोकप्रतिनिधी शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एक पाऊल पुढे का टाकत नाही?असा प्रश्न पीडित शेतकरी उपस्थित करीत आहे.जिल्हा कृषी अधीक्षकानी पीडित शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
पंचनामा अहवाल हा जिल्हा कृषी अधीक्षक यांचेकडे पाठविण्यात आला आहे.कृषी केंद्रांना परवाना देण्याचा अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे.त्यामुळे कारवाही करण्याचा अधिकारी त्यांनाच आहे. पंचनामा अहवालाबाबत काय कार्यवाही झाली याबाबत आमच्या तालुका कृषी कार्यालयात कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही.
मारोतराव वर्भे
कृषी अधिकारी
कृषी विभाग कार्यालय ,वरोरा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!