सहकार महर्षी एड. बाबासाहेब वासाडे यांना झाडीबोली साहित्य मंडळातर्फे ऑनलाइन श्रद्धांजली अर्पण
सहकार महर्षी एड. बाबासाहेब वासाडे यांना झाडीबोली साहित्य मंडळातर्फे ऑनलाइन श्रद्धांजली अर्पण
-------------
चंद्रपूर (प्रतिनिधी) : झाडीबोली साहित्य मंडळ शाखा चंद्रपूरच्या वतीने आभासी पद्धतीने श्रद्धांजली कार्यक्रम ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 21 सप्टेंबरला पार पडला.
कार्यक्रमाचे उद्देश स्पष्ट करण्यासाठी झाडीबोली साहित्य मंडळाचे भंडारा जिल्हा झाडी बोलीचे अध्यक्ष कुंजीराम गोंधळे यांना पाचारण करण्यात आले. यावेळी एड. बाबासाहेब वासाडे यांच्या भूतकाळातील कार्याचा मागोवा घेतला.
एड. वासाडे हे सन २००३ मध्ये मुल येथील कर्मवीर महाविद्यालयात आयोजित तीन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यास ज्या व्यक्तींचे हातभार लागले त्यात बाबासाहेब वासाडे हे एक असल्याचे सांगून आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
बामणी येथील विनायकराव साळवे यांनी आपल्या मनोगतात एड. वासाडे हे एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सहकार महर्षी होते तसेच त्यांच्या कामाचा पसारा खूप मोठा होता. अनेक शिक्षण संस्था स्थापन करून शैक्षणिक कार्य सुरू केल्याचे सांगितले. ते म्हणाले, माझा वासाडे परिवाराशी तीन पिढ्यापासून संबंध आहे. त्यांचे लहान बंधू पुरुषोत्तम हे माझे समवयस्क होते. त्यांच्या गावी पळसगाव येथे मी जायचो. त्यांच्या बंधूंशी मी खेळायचो. बाबासाहेबांच्या निधनाने वासाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांना धैर्य मिळो अशी भावना व्यक्त केली.
डॉ.धर्मा गावंडे (सावली) यांनी बाबासाहेब वासाडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकतना ते आपल्यातून निघून गेल्याने सर्वांवर दुःख ओढवले, असे ते म्हणाले. मात्र त्यांच्या शैक्षणिक सेवा कार्यामुळे अनेकांना नोकरी मिळाली, स्थैर्य मिळाले, असे डॉ. गावंडे म्हणाले.
दिनेशकुमार अंबादे गोरेगाव गोंदिया यांनी बाबासाहेबांच्या कार्याची प्रचिती अनेकदा वर्तमानमानपत्रातून वाचल्याचे नमूद केले.
पुरुषोत्तमजी ठाकरे गडचिरोली यांनी आपल्या मनोगतात एड. वासाडे यांच्या शैक्षणिक संस्था कार्याबद्दल माहिती दिली.
विश्वासजी सूर परसोडी यांनी बाबासाहेब वासाडे यांचे ग्रामीण भागातील राजकीय व सामाजिक कार्य खूप उत्तम होते, असे सांगितले.
सुनील बावणे म्हणाले की,एड. वासाडे यांचे कार्य मी अतिशय जवळून बघितले आहे. 1990 - 91 मध्ये मी वरोरा येथे शिक्षण घेत होतो. त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. त्या काळात धरण हे चिन्ह घेऊन ते 'अपक्ष' म्हणून निवडणूक रिंगणात उभे होते. मात्र त्यांना यश मिळाले नसले. तरी सुद्धा भरघोस मत त्यांना घेता आली. माझ्या गावाला क्रिकेटचे सामने व्हायचे. त्यावेळी सुद्धा त्यांची उपस्थिती असायची. ते नेहमी म्हणायचे "आम्हाला अशा कार्यक्रमांमध्ये बोलवत चला." त्यानंतरच्या अनेक क्रिकेट सामन्यांमध्ये आम्ही त्यांना अतिथी म्हणून पाचारण केले होते. त्यावेळी आमच्या क्रिकेट संघाला त्यांनी मदत सुद्धा केली होती . त्यांच्या कर्मवीर महाविद्यालांमध्ये मी शिक्षण घेत होतो.यावेळी माझी साहित्य प्रतिभा पुढे येण्यास मदत झाली , असे ते म्हणाले.
डॉ. श्रावण बाणासुरे आणि (बल्लारपूर ) यांनीही आपण त्यांना दोनदा भेटल्याचे सांगितले. त्यांच्या प्रयत्नांने येनबोडी, राजुरा, बल्लारपूर, लाठी आदी ठिकाणी त्यांच्या शिक्षण संस्था उभ्या आहेत, असे म्हणाले तर देवराव कोंडेकर यांनी एड. वासाडे यांनी चंद्रपूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष असताना केलेल्या विविध प्रकारच्या योजनांचा उल्लेख केला.
श्रध्दांजली सभेचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी एड. बाबासाहेब वासाडे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले. ते म्हणाले की,मुल येथे संपन्न झालेल्या तीन दिवस चाललेल्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे ते स्वागतातध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी आपली शैक्षणिक वास्तू कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली. झाडीबोली साहित्य चळवळीस समर्थ साथ दिली. सन 1991 ला येनबोडीला विदर्भातील पहिली खाजगी आयटीआय त्यांनी स्थापन केली होती. त्या संस्थेच्या प्राचार्य पदाची सूत्रे बाबासाहेब वासाडे यांनी माझेकडे दिली होती.दीड वर्ष कर्मवीर खाजगी आयटीआय काम करतांना प्रशिक्षण कार्य, विविध पत्रव्यवहार , मशिनरी मेंटेनन्स,अहवाल निर्मिती आदी महत्त्वाची कामे शिकलो. त्यांच्या त्या काळातील सहवासात मी व्यवस्थापन, बोलण्याचे धाडस, लोकांशी संवाद या गोष्टी मी शिकलो असे प्रांजळपणे कबूल केले. झाडीच्या अनेक संमेलनाला एड. वासाडे यांची उपस्थिती असायची. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत महिला बचत गटांना त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिले होते. झाडीबोली साहित्य चळवळीला दिलेले अमूल्य योगदान आहे. असे नमूद करीत एड. बाबासाहेब वासाडे यांना श्रद्धांजली वाहिली.
सूत्रसंचालन व आभार श्रावण बाणासुरे बल्लारपूर यांनी केले. कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबी कुंजीराम गोंधळे यांनी हाताळल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!