मशाल पेटणार की तुतारी फुकंणार?
मशाल पेटणार?
की
तुतारी फुकंणार?
विधानसभा निवडणूकीचे
वारे वाहू लागले आहे. इच्छुक उमेदवारांची भाउगर्दी
आहे. बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रात भाजपा विरूध्द
कॉंग्रेस अशी परंपरागत निवडणूक लढविली जाते.
जात, समाज, गावेही या दोन पक्षातच विभागली गेली आहे. अनेक निवडणूकीत तिसरा पक्षानी मजल मारण्यांचा प्रयत्न
केला, मात्र ते तिसर्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावरच थांबू शकल्यांने, या निर्वाचन
क्षेत्राची चर्चा फक्त अन् फक्त कॉंग्रेस—भाजपातच
होत आहे.
यावर्षीची लोकसभा निवडणूकीत
भाजपाचे उमेदवार, विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कॉंग्रेसच्या उमेदवार
प्रतिभा धानोरकर यांचेकडून पराभव पत्करावा लागला.
या निर्वाचन क्षेत्रातून मोठी आघाडी कॉंग्रेस उमेदवारांला मिळाली, यामुळे कॉंग्रेस
आणि इंडिया आघाडीतील इच्छुकांची भलीमोठी यादी तयार झाली आहे.
कॉंग्रेसच्या नेहमीच्या
आणि नविन चेहर्याव्यतिरिक्त शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार)
या इंडिया आघाडीतील दोनही घटक पक्षानी बल्हारपूरवर दावेदारी केली आहे. केवळ दावाच केला नाही तर, प्रत्यक्ष निवडणूक प्रचारालाही
सुरूवात केल्यांने, या विधानसभेत पंजा ऐवजी मशाल पेटणार की तुतारी फुंकणार? अशी राजकीय
वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांना
बल्हारपूर विधानसभा निवडणूकीत तयारी करायला सांगीतले. व त्यानुसार त्यांनी मागील वर्षभरापासून तयारी सुरू
केली आहे. लोकांच्या समस्यांवर आक्रमक होणे,
आंदोलन करणे, आवश्यकतेनुसार नागरीकांना मदत करणे, तरूणांचे पक्ष प्रवेश, प्रचार फलके,
मेळावे यासारख्या माध्यमातून त्यांनी आपला 'उमेदवारीचा चेहरा' मतदारांसमोर आणला आहे.
त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. बल्हारपूर मतदार संघात बाळासाहेबांना, माणनारा,
शिवसेनेचा मोठा वर्ग आहे. एकेकाळी मूल—पोंभूर्णा—बल्हारपूर
तालुक्यात भाजपापेक्षाही शिवसेनेची ताकद जास्त होती. तरूणाईला शिवसेना भुरळ घालू शकते, त्यामुळे हा मतदार
संघ इंडिया आघाडीने शिवसेना (उबाठा) दिल्यास, संदीप गिर्हे हे भाजपाला चांगली लढत देवू
शकतात. मात्र, शिवसेनेला, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या विदर्भापेक्षा
मुंबई व परिसरातील मतदार संघातच अधिक 'इंटरेस्ट' असल्यांचे वेळोवेळी दिसून आले. यामुळेच उध्दव ठाकरे यांनी संदीप गिर्हे यांना तयारी
करायला सांगीतले असले तरी, बल्हारपूरची सीट ते 'बार्गेनिंग पॉवर'साठी वापरून, मुंबईजवळील
एखादी अधिकची जागा ते मागून घेवू शकतात. संदीप गिर्हे यांनीही एकदा, उध्दव साहेबांनी तयारी करायला सांगीतल्यांने
तयारी सुरू केली असून, उमेदवारी मिळाल्यास ताकदीने लढवू, अन्यथा पक्षाचे आदेशाप्रमाणे
काम करू असे सांगीतले. इंडिया आघाडी सध्या
एकसंघ आहे, मात्र राजकीय क्षेत्रात काही वेगळे घडून, शिवसेना स्वतंत्र लढली तर, संदीप
गिर्हे यांची मेहनत बल्हारपूरच्या राजकीय आखाड्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे.
शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी
कॉंग्रेस शरद पवार गटानेही बल्हारपूरच्या जागेवर दावा केला आहे. मागील तीन—चार
निवडणूकीपासून राष्ट्रवादीने बल्हारपूर आणि चिमुर या दोन जागेवर राष्ट्रवादीने हक्क
सांगीतला आहे. या दोनही जागेवर मागील तीस—चाळीस वर्षापासून कॉंग्रेस हरत असल्यांने, हरणारी जागा
आम्हाला द्या असा दावा राष्ट्रवादीचे नेते करीत आहे.
लोकसभेत इंडिया आघाडीचे
उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना बल्हारपूर मतदार संघातून प्रचंड आघाडी मिळाल्यांने,
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्याही आशा पल्लवीत झाल्या
आहेत. मागील अनेक वर्षापासून ते राजकारणात
आहेत. लोकसभेची निवडणूक ते बसपाकडून लढविले
आहेत. त्यांनी बल्हारपूरची सीट इंडिया आघाडीने
राष्ट्रवादीसाठी न सोडल्यास, सर्व पदाधिकारी पक्षाचे सामुहीक राजीनामे देतील असा थेट
जाहीर इशाराच पक्ष नेतृत्वाला दिला आहे. तशा बातम्या माध्यमात झळकल्या आहेत.
महिणाभरापूर्वी राजेंद्र
वैद्य यांनी आपली दावेदारी कायम करण्यासाठी दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष
शरदचंद्र पवार यांची भेट घेतली होती. यावेळी
पवार साहेबांनी, 'आपल्याला फक्त बल्हारपूरची एकच जागा हवी ना?' असे विचारत, ती निश्चित
मिळेल, कामाला लागा असे आश्वस्त केले. पब्लिक पंचनामाशी बोलतांना श्री. वैद्य यांनीही
या चर्चेला दुजोरा दिला. पवार साहेबांच्या
'कामाला लागा'च्या आदेशानुसार, श्री. वैद्य यांनी गावभेटी सुरू केले, प्रचार यंत्रणाही
कामाला लावली. प्रचारात व्यस्त असतांनाच त्यांच्या
प्रकृतीने दगा दिल्यांने, सध्या त्यांना 'बेड रेस्ट' घ्यावा लागत आहे. मात्र विधानसभेची निवडणूक आॅक्टोबरच्या नंतर होत
असल्यांने, बल्हारपूरची सीट राष्ट्रवादीच्याच कोट्यात जाणार असून आपण 15 आॅक्टोबरपासून,
प्रचाराला सुरूवात करणार असल्यांचे त्यांनी पब्लिक पंचनामाला सांगीतले.
बल्हारपूर निर्वाचन
क्षेत्रात राष्ट्रवादीची ताकद जेमतेम असली तरी, या पक्षाकडे असलेले संसाधन, राजेंद्र
वैद्य यांचा राजकीय अनुभव आणि सोबतीला त्यांची 'जात' यामुळे त्यांची उमेदवारी ही दमदार
होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मागील अनेक निवडणूकीत कॉंग्रेस या मतदार संघात कायम लढत आल्यांने, ही जागा कॉंग्रेस आपल्या कोट्यातून घटक पक्षाकडे जावू देणार नाही अशी शक्यता असली तरी, शरद पवार यांनी आपल्या सहकारींना दिलेले 'शब्द' आणि इंडिया आघाडीतील शरद पवार यांची पॉवरफुल भूमिका पहाता ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेल्यास नवल नाही. १९९९ च्या निवडणूकीत मूल—सावली या मतदार संघातून भाजपाच्या शोभाताई फडणवीस (मिळालेली मते ६२७७३) यांचे विरोधात परंपरागत कॉंग्रेसने ही जागा स्वता न लढविता रिपाईला देत मृणालीनी गिरीश खोब्रागडे (मिळालेली मते ३१७१८) यांना रिंगणात उतरविले होते. १९९९ चा इतिहास बघता, २०२४ मध्ये ही जागा 'मशाल' किंवा 'तुतारी' यांना गेल्यास नवल नाही.
विजय सिध्दावार
9422910167/7588883477



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!