अतिरिक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश


 ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथील जिल्हा परिषद शाळा
शिक्षक अवेळी येतात, अध्यापन करत नाही
पहिली ते आठवीच्या वर्गांना पाच शिक्षक
 विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान

 ब्रम्हपूरी (विनोद चौधरी) 
शहर प्रतिनिधी ब्रम्हपुरी- गुरुवारला झालेल्या प्रजासत्ताक दिनी सांगली जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या कार्तिकच्या भाषणाची अख्खा महाराष्ट्रभर चर्चा आणि कौतुक झाले. जिल्हा परिषद शाळांमध्येच असे विद्यार्थी घडतात असा एक सुर पण निघाला. आज त्या घटनेला अवघे पाच दिवस पूर्ण झाले असतांना राज्याच्या पूर्व टोकावरील वाघांसाठी प्रसिद्ध चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसंबी खडसमारा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षक वक्तशीर नाहीत, अभ्यासक्रम शिकवत नाही त्यामुळे होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीला कंटाळून गावातच फेरी काढून अभिनव आंदोलन केले. आम्हाला आता असलेले शिक्षक बदलून नवीन जादा शिक्षक देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या बेधडक आक्रोशाने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
              विद्यार्थी, शिक्षक यांच्या जीवनात वक्तशीरपणाला सर्वोच्च स्थान आहे. शालेय जीवनातून वेळेचे महत्व अंगी भिणले तर विद्यार्थ्यांचे अख्खे जीवन यशस्वी होते. त्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी अध्यापन करावे आणि विद्यार्थ्यांनी अध्ययन करावे हेच शिक्षक आणि विद्यार्थी यांचे महत्वाचे कर्तव्य असते. लोकांसांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण अशी एक म्हण मराठीत आहे. या म्हणीला साजेसे वर्तन कोसंबी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांचे होते. अखेर त्याच शाळेच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या शाळेतील अनियमित येण्याला, अशोभनीय शब्दांना कंटाळून आज गावात आगळेवेगळे आंदोलन केले. सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रांगेत गावातील रस्त्यांनी फेरी काढून आपली मागणी अख्ख्या गावाला ओरडून सांगितली.
           शाळेत असलेल्या एकूण पाच शिक्षकांपैकी एक शिक्षिका वगळता उरलेले सर्व चार शिक्षक बदलून पाहिजे. पहिली ते आठवीसाठी सात-आठ शिक्षक पाहिजे असा सुर लावला. या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थ्यांनीच केले असे कळते. वरिष्ठ शिक्षण अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!