!! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव !!
!! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव !!
!!!! वंदे मातरम्
वंदे मातरम्
सुजलाम सुफलाम
मलयजशीतलाम् ,
सस्यशामलाम मातरम्,
वंदे मातरम्
वंदे मातरम् !!!!
अशी माझी सुजलाम सुफलाम भारतमाता इंग्रजांच्या ताब्यात होती, म्हणजेच पारतांत्र्यात होती आणि
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी या देशात स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली. भारतमाता स्वतंत्र झाली. याला आता ७५ वर्ष पूर्ण झाली. त्याप्रित्यर्थ माननीय नरेंद्र मोदींनी " आझादी का अमृत महोत्सव" साजरा करण्याची घोषणा केली आहे आणि घरो घरी तिरंगा फडकवण्यास सांगीतले आहे. आपण सर्व भारतीयांनी घरो घरी तिरंगा फडकवून हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलाच पाहिजे;
लकारण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती जणांना कष्ट सहन करावे लागले, हे आपल्याला माहीतच आहे. कित्येक जणांना आपल्या घरादाराचा त्याग करावा लागला. आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले . आबालवृद्धांपासून तर तरुण, स्त्री पुरूषांनी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप हालअपेष्टा सहन केल्या. इंग्रजांनी केलेला अन्याय, जुलुम तर आपण लहानपणापासूनच इतिहासात वाचत आलेले आहोत. एवढ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य टिकवून ठेवणे, हे आपल्या प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. आपला भारत देश प्रत्येकच क्षेत्रात कोणत्याही देशाच्या मागे राहता कामा नये. आपला भारत देश विश्वगुरु होईल, असा विश्वास १३० कोटी भारतीयांच्या मनात नंदादिपासारखा तेवत रहायला हवा.
या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी प्रत्येक मातेने आपल्या मुलांना आपल्या भारत मातेबद्दल अभिमान बाळगणे, आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची वृत्ती निर्माण केली पाहिजे. ज्याप्रमाणे जिजामातेने शिवाजी महाराजांवर संस्कार केले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, त्याचप्रमाणे आपल्या मुलांमध्ये देशप्रेमाचे बीज रुजवणे, हे प्रत्येक मातेचे कर्तव्य आहे. प्रत्येक मुलामध्ये भगतसिंग , राजगुरू आणि सुखदेव यांच्यासारखी देशप्रेमाची आग तेवत राहिली पाहिजे. आपली मातृभुमी पारतंत्र्यात का गेली, याचा अभ्यास आजच्या तरूण पिढीला असणे आवश्यक आहे.
आपल्या भारतमातेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. जिच्या भूमीमध्ये राम ,श्रीकृष्णासारख्या देवांनी जन्म घेतला. अनेक क्रांतिकारी, देशभक्त जन्माला आले. अनेक संत जन्माला आले. आपली भारतमाता संतांची भूमी मानल्या जाते. त्यामुळे ती पवित्र भूमी आहे. तिचे पावित्र्य टिकवून ठेवणे, हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. परदेशातील लोकही आता भारतात साधना करण्यासाठी येत आहेत; कारण आपल्या भारताची संस्कृतीच एवढी महान आहे, जिच्या शीरावर काश्मीर सारखा सुंदर मुकुट आहे आणि जिचे चरण हिंदी महासागरातील लाटा सदैव धुत असतात; म्हणूनच एका कवीने म्हटले आहे " जहाॅं डाल डाल पर सोने की चीडीयाॅं करती है बसेरा, वो भारत देश है मेरा "
अशा महान भारतात आपला जन्म झाला याबद्दल किती कृतज्ञ राहू तेवढे
कमीच आहे.
म्हणुनच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण सर्व भारतीयांनी एवढ्या उत्साहात आणि जोमात साजरा करायचा की, त्या दिवशी पृथ्वीवर आपला देश एखाद्या कोहीनुर हि-यासारखा चमकला पाहिजे आणि तेव्हापासून कोणाचीही वाकडी नजर आपल्या देशाकडे राहणार नाही.
" अशा भारत मातेला माझा शतशः प्रणाम "
!! भारत माता की जय!!
सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादिनानिमीत्त खूप खूप शुभेच्छा !
सौ. भारती जीवन कोंतमवार, मुल जि. चंद्रपूर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!