झाडीबोली साहित्य मंडळाच्या जिल्हा शाखेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
झाडीबोली साहित्य मंडळाच्या
अंतर मंतरच्या चारोळी रचनांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव - डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे
गडचिरोली (प्रतिनिधी)
झाडी बोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा गडचिरोली चा वर्धापन दिन नुकताच परिश्रम भवनात संपन्न झाला. पहिल्या
सत्रात ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या अंतर-मंतर या चारोळी संग्रहावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत अध्यासनाचे प्रमुख डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे होते. प्रमुख भाष्यकार म्हणून प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर (कुरखेडा), भूभरीकार अरूण झगडकर (गोंडपिपरी) होते. गझलकार मिलिंद उमरे, झाडीबोलीचे जिल्हा प्रमुख डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमतः अंतर मंतर चारोळी संग्रहाचे लोकार्पण झाल्यानंतर डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून जिल्हा शाखेच्या विविध उपक्रमांवर सविस्तर प्रकाश टाकला. चारोळी संग्रहाच्या निर्मिती संबंधाने
ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. आरेकर म्हणाले, वास्तविक कविता ही कवींची आत्मानुभूती असते. अंतर मंतर मधील रचना कवीच्या चिंतनातून, अंतःकरणातून उमटल्याचे दिसून येते. त्यातून त्यांनी संतांचा अभ्युदयाचा मार्ग प्रामुख्याने प्रतिपादित केलेला आहे. समाज उन्नतीचा विचार आहे ,ही त्यामागची भावना आहे.
डॉ. पाखमोडे म्हणाले, कवी हा मुळात सर्जनशील असतो . आपल्या प्रतिभेने भावभावनांचे सहज प्रकटीकरण करणे हे साहित्यिकांचे कर्तव्य असते. अंतर मंतर मधून प्रस्तुत कवीनी जणू अंतःकरण शुद्धीचा मंत्र दिलेला आहे. या चारोळ्यावर राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रभाव असून यात आशयघनता , आशयसंपन्नता दिसून येते. यात समाज सुधारणेचा मंत्र आहे. जे जे सात्विक आहे ते ते वाचकांपुढे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
अरूण झगडकर म्हणाले, पुस्तकातली माणसं वाचण्यापेक्षा काही माणसांमध्ये पुस्तकं असतात.ती जीवंत पुस्तके आपण वाचायला शिकलो पाहिजे.अंतर मंतर मधील एकूण १९२ चारोळ्यातून कवींनी आत्मानुभवासोबत झाडीपट्टीतले निसर्ग सौंदर्य उत्तमरित्या रेखाटलेले आहे.
सूत्रसंचालन कवी कमलेश झाडे यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण किलनाके यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात खुले
कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रा. विनायक धानोरकर होते. तर प्रमुख अतिथी प्रमोद बोरसरे, विलास निबोंरकर होते.
सहभागी कवी म्हणून सौ. संगीता बांबोळे, सौ. मनिषा पेंदोर,
पुरुषोत्तम ठाकरे, उपेंद्र रोहणकर , मारोती आरेवार, जितेंद्र रायपुरे , सौ. भारती तितरे, चेतन ठाकरे , सुरेश गेडाम,वामन गेडाम, कमलेश झाडे आदींनी स्वरचित कविता सादर केल्या. सूत्रसंचालन संजीव बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मारोती आरेवार यांनी केले. या कार्यक्रमात मौशीखांब येथील वाचनालयास डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे यांनी एक ग्रंथ संच भेट दिला. सदर संच पांडुरंग समर्थ यांनी स्विकारला तर बंडोपंत बोढेकर यांनी एक ग्रंथ संच संत मंजुळा माता सार्वजनिक वाचनालय तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास भेट दिला. कार्यक्रमास पंडित पुडके डके, वरूण धोडरे ,पांडुरंग समर्थ, प्रा.विलास पारखी, उदय धकाते , विठ्ठल कोठारे प्रामुख्याने हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!