एक रुपयात पीक विमा बंद - भात उत्पादक शेतकऱ्यांना भरावे लागणार १२२० रुपये

सावली (विजय कोरेवार ) 

         महाराष्ट्र शासनाने २०२३ पासून सुरु केलेला "एक रुपयात पीक विमा" बंद झालेला असून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या २४ जुनच्या परिपत्रकानुसार आता शेतकऱ्यांना हेक्टरी १२२० रुपये विमा रक्कम भरावी लागणार आहे.

        नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट, पूर, दुष्काळ, कीड, रोगराई यामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी आणि आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकरी हिस्सा, राज्य शासनाचा हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून एकूण रक्कम विमा हप्त्यापोटी पीक विमा कंपनीला दिली जाते. या योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीनंतरचे नुकसान आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना चार टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई दिली जात होती. 

चंद्रपूर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना भरावे लागणार हेक्टरी १२२० रुपये 

सन २०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचा लाभार्थी हिस्सा फक्त एक रुपये ठेऊन विमा काढला. शासन स्वतःच्या तिजोरीतून शेतकरी हिस्सा विम्याची रक्कम विमा कंपनीकडे भरत होती मात्र खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ पासून एक रुपयाचा विमा बंद करून शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरण्याचा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने २४ जूनला परिपत्रक काढले आहे. हा विमा ऐछीक असून कर्जदार शेतकऱ्यांनाही विमा पाहिजे की नको हे लिहून द्यावा लागणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनी असून ऑनलाईन पद्धतीने विमा अर्ज भरावा लागणार आहे. राज्यात जिल्ह्यानुसार विमा रक्कम वेगवेगळी असून चंद्रपूर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी हेक्टरी १२२० रुपये तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १२०० रुपये विमा रक्कम भरावी लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!